प्रदूषण करणाऱ्या २१ कंपन्या बंद

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची माहिती



महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ६०७ उद्योगांपैकी ३११ कंपन्यांचा सर्व्हे केला असून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या ५० औद्योगिक कंपन्यांना नोटीस देण्यात आली असून २१ कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी बाहेर सोडून प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक कंपन्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली.


_ कल्याण-डोंबिवली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील कारखान्यांमुळे होत असलेल्या वायुप्रदूषणासंदर्भात आमदार गणपत गायकवाड यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे बोलत होते. कोणत्याही औद्योगिक कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बाहेर सोडणे सक्तीचे आहे. प्रक्रिया न केल्यास संबंधित उद्योगांवर कडक कारवाई करण्यात येईल. कल्याण-डोंबिवली येथील सामूहिक सांडपाणी प्रक्रिया यंत्रणेचे आधुनिकीकरण लवकरच करण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळेस जे अनधिकृतरीत्या डंपिंग करतात त्यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यासाठी पथक नेमण्यात आले आहेत. याचबरोबर नगरविकास आणि एमआयडीसीच्या वतीने या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. _


भिवंडी तालुक्यातील मौजे शेलार येथील बेकायदेशीर कारखान्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबात शांताराम मोरे यांनी विचारलेल्या प्रश्नास उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, या परिसरातील दोन कंपन्या बंद केल्या आहेत. दोन कंपन्यांना नोटीस देण्यात आली आहे. चार उद्योगांना प्रस्तावित आदेश बजावण्यात आले आहेत. या कंपन्यांत कामगार काम करतात त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येते, मात्र नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांनाच परवानगी देण्यात येते. तसेच स्थानिक परिसरातून येणारे सांडपाणी आणि औद्योगिक कंपन्यांतून येणारे रासायनिक पाणी यावर प्रक्रिया करूनच हे पुढे जलस्रोतात सोडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत रवींद्र वायकर, योगेश सागर, सुनील प्रभू, रईस शेख आदींनी सहभाग घेतला.